दत्तात्रेय आणि वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय हा मराठी भक्तिपरंपरेतील एक उदार आणि उदात्त प्रवाह असल्यामुळे समन्वयाचे प्रतीक असलेला दत्तात्रेय वारकऱ्यांनाही पूज्य ठरल्यास आश्चर्य नाही. नाथ पंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानदेव यांच्या साहित्यांत दत्तविषयक उल्लेख अभावानेच आढळतात. ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांत दत्तविषयक उल्लेख नाही. परंतु ज्ञानदेवांच्या अभंगगाथ्यात जो एक दत्तविषयक अभंग आहे त्यात ज्ञानदेवांनी दत्तगुरूविषयीचा असीम श्रद्धाभाव उत्कटपणे व्यक्त केला आहे.
पैल मेरूच्या शिखरीं। एक योगी निराकारी।
मुद्रा लावूनि खेचरी। ब्रह्मपदीं बैसला॥१॥
तेणें सांडियेली माया। त्यजियेली कंथाकाया।
मन गेलें विनया। ब्रह्मानंदामाझारीं॥२॥
या ज्ञानदेवांच्या अभंगात व्यक्त झालेले दत्तस्वरूप पौराणिक दत्तदेवतेसारखे जाणवत नसून नाथ संप्रदायांत आदरणीय ठरलेले, एखाद्या महासिद्धासारखे वाटते. येथे योगसाधनेच्या मार्गाने सिद्धावस्था प्राप्त करून घेतलेला एक महायोगी असा ‘दत्तात्रेय योगिया’ अभिप्रेत आहे. ज्ञानदेवांच्या समग्र साहित्यातील हा दत्तगौरवाचा एकच अभंग ज्ञानदेवांचा दत्तात्रेयाविषयीचा श्रद्धाभाव समर्थपणे व्यक्त करणारा असून, त्या अभंगात दत्तात्रेयाचे मूलस्वरूपही सूचित झाले आहे, असे मला वाटते. या अभंगातील ‘पैल मेरूच्या शिखरीं’ हा स्थलनिर्देश माहूर क्षेत्रासंबंधीचा आहे. मेरुवाळा नामक तलावाजवळ डोंगरावर जे दत्तस्थान आहे, त्याला lp09‘शिखर’ असे नाव आहे. या अभंगाच्या अखेरच्या कडव्यात गोदावरी-तीरावरचे ‘आत्मतीर्थ’ आणि पांचाळेश्वर या दोन दत्तस्थानांचा उल्लेख आहे. ‘ज्ञानदेवाच्या अंतरीं। दत्तात्रेय योगिय॥’ एवढय़ा मोजक्याच शब्दांत ज्ञानदेवांनी आपली भावसघनता व्यक्त केली आहे.
ज्ञानदेवांच्या कालखंडानंतर वारकरी संप्रदायाचे भरण-पोषण ज्या महामानवाने केले ते श्रीएकनाथ एक श्रेष्ठ दत्तोपासक होते. नाथांना मिळालेला गुरुबोध दत्तोपासनेच्या परंपरेतील असल्यामुळे गुरूपरंपरेच्या दृष्टीने त्यांचा समावेश दत्त संप्रदायातील साधुसंतांतच करावा लागेल. नाथांची दत्तोपासना आणि दत्तविषयक रचना विशेष अशीच होती. ‘दत्तप्रबोध’ हा दत्त संप्रदायातील सन्मान्य ग्रंथ लिहिणारे कावडीबोवा हे नाथांच्या परंपरेतील सुविख्यात वारकरी संत श्रीनिंबराज दैठणकर यांच्या शिष्यशाखेतील होत.
‘तीन शिरें सहा हात’ अशा त्रिमूर्तीला दंडवत घालणारे तुकोबा दत्तात्रेयाविषयी भक्तिभाव व्यक्त करताना म्हणतात:
नमन माझें गुरुराया। महाराजा दत्तात्रेया॥१॥
तुझी अवधूत मूर्ति। माझ्या जीवाची विश्रांति ॥२॥
जीवींचें सांकडें। कोण उगवील कोडें॥३॥
अनसूयासुता । तुकां म्हणे पाव आता॥४॥
जीवींचे सांकडे फेडणाऱ्या आणि भवभ्रमाचे कोडे उलगडणाऱ्या अवधूत दत्तात्रेयाची मूर्ती तुकारामांच्या हृदयाची विश्रांती बनलेली आहे.
कल्याणांचा हा दत्तात्रेय सतेज सुंदर कांतीचा असून दिगंबर आहे. तो सनातन सिद्ध असून, विधि, हरि आणि त्रिपुरारि या त्रयीचा समावेश असणारा पूर्णावतारी आहे. तो भागीरथीच्या तीरी नित्य आन्हिक उरकतो आणि करवीरांत भिक्षा मागतो.
स्वत:ला ज्ञानेश्वरकन्या मानणारे विदर्भातील प्रज्ञाचक्षु संत श्रीगुलाबराव महाराज यांच्या ‘प्रियलीलामहोत्सव’ नामक ग्रंथात दत्तमहिमान यथार्थ गायिले आहे :
सहावा सुंदरु सर्व विश्वा गुरु।
अत्रीचा कुमरु दत्तात्रेय॥
अनसूयातपें जाहला जो प्राप्त।
जीवा उद्धरीत एकसरा॥
न होय जयाचें मोघ दरुशन।
कृपावंत पूर्ण दीनानाथु॥
नाना अवतार होऊनियां गेले।
दत्तत्व संचलें जैसें तैसें॥
दत्तात्रेय आणि समर्थ संप्रदाय
एकनाथाप्रमाणेच समर्थानाही दत्तात्रेयाने मलंगवेशाने दर्शन दिल्याची एक अद्भुत कथा समर्थाच्या सांप्रदायिक चरित्रातून आढळते. दासबोध रचनेसाठी वापरलेल्या संदर्भग्रंथांची जी यादी दासबोधाच्या पहिल्या दशकातील पहिल्याच समासांत समर्थानी दिली आहे, तीत दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा समावेश आहे. ज्ञानदेवांप्रमाणेच समर्थ दत्तात्रेयाला उपास्य देवता न मानता गुरूस्वरूप सिद्धपुरुष मानतात आणि त्याचा गोरक्षाबरोबर उल्लेख करतात.
दत्त गोरक्ष आदि करूनी। सिद्ध भिक्षा मागती जनी।
नि:स्पृहता भिक्षेपासुनी। प्रगट होये॥
‘अवधूतगीता’ हा ग्रंथ दत्तात्रेयाने गोरक्षनाथास निरूपिला आहे अशी समर्थाची साक्ष आहे.
अवधूतगीता केली। गोरक्षीस निरोपिली॥
हे अवधूतगीता॥ बोलिली। ज्ञानमार्ग॥
समर्थाचे एक स्वानुभवी शिष्य दिनकरस्वामी तिसगांवकर यांनी आपल्या ‘स्वानुभवदिनकर’ या ग्रंथात संमतिग्रंथ म्हणून अवधूतगीतेचा आदर केला आहे. दिनकरस्वामीही समर्थाप्रमाणेच दत्तात्रेयाचा समावेश सिद्धमालिकेत करतात.
दत्त दुर्वासादि वशिष्ठ हनुमंत।
कपिल मत्स्येंद्रादि गोरक्ष अवधूत।
नवनाथ चौऱ्ह्यासी सिद्ध युक्त। योगसिद्धि थोरावले॥
दत्त गोरक्ष हनुमंत। आदिनाथ मीन गैनि अवधूत।
चौऱ्ह्यासी सिद्ध आणि योगी समस्त। नवही नाथ॥
संत महंत मुनेश्वर। सिद्ध साधु योगेश्वर
दत्त गोरक्ष दिगंबर। जये स्वरूपीं निमग्न॥
समर्थाचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांच्या एका पदांत दत्तात्रेयाच्या स्वरूपाचे, संचाराचे आणि सर्वप्रियतेचे भक्तिपूर्ण वर्णन आहे. कल्याणांचा हा दत्तात्रेय सतेज सुंदर कांतीचा असून दिगंबर आहे. तो सनातन सिद्ध असून, विधि, हरि आणि त्रिपुरारि या त्रयीचा समावेश असणारा पूर्णावतारी आहे. तो भागीरथीच्या तीरी नित्य आन्हिक उरकतो आणि करवीरांत भिक्षा मागतो. त्याचा रात्रीचा निवास (सिंहाद्रि-) पर्वतावर असतो. त्याची योगलीळा अद्भुत आहे. तो कृपाघनमूर्ती असल्यामुळे दीन अनाथांचा तो त्राता वाटतो. त्याचा महिमा असा असल्यामुळे अनेक पंथ पुरातन काळापासून त्याचे ध्यान करीत आले आहेत.
अत्रिनंदन वंदन जगत्त्रयीं।
अनाथ दीन तारी। दत्त भिक्षाहारी॥
सुंदर कांति सतेच मनोहर। दिगंबरवपुधारी॥
सिद्ध सनातन पूर्णावतारी। विधी हरि त्रिपुरारी॥
या शिवाय समर्थ संप्रदायातील अनेक संतमहंतांनी व्यक्त कलेला दत्त विषयक उत्कट भक्तिभाव आपणास त्यांच्या वाङ्मयसंभारांत अनेक ठिकाणी आढळेल.
No comments:
Post a Comment