दत्तात्रेय आणि आनंद संप्रदाय
महाराष्ट्राचे लोकप्रिय आख्यानकवी श्रीधरस्वामी नाझरेकर हरिवरदा-कार श्रीकृष्णदयार्णव हे दोन वेगवेगळय़ा परंपरांतील सत्पुरुष आनंद संप्रदायी होते. या दोघांच्याही गुरुपरंपरा दत्तात्रेयादी आहेत. श्रीधरांची गुरुपरंपरा दत्तात्रेय-सदानंद-रामानंद-अमलानंद-गंभीरानंद-ब्रह्माानंद-सहजानंद-पूर्णानंद-दत्तानंद- ब्रह्माानंद-श्रीधर अशी आहे. पूर्णानंदांचे नातशिष्य रंगनाथस्वामी हे श्रीधरांचे चुलत चुलते होते. परंपरेतील अनेक संतांनी ‘गुरुगीते’वर टीका लिहिल्या आहेत. रंगनाथस्वामी काही पदांत दत्तात्रेयाचे महिमान गायिले आहे. एका पदांत दत्तात्रेयाच्या विश्वव्यापक स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात :
गुरुदेव दत्ता, अनंत ब्रह्मांडीं तुझी सत्ता॥ध्रु॥
विश्वव्यापका विश्वंभरिता, विश्वधीशा विश्वातीता।
प्रमेय-प्रमाता-प्रमाणरहिता, जगद्गुरू अवधूता॥१॥
नित्य निरंतर अगमागोचर, परात्परतर सुखदाता।
दीनदयाकर दत्त दिगंबर, सत्यज्ञानानंता॥२॥
रंगनाथस्वामींनी ‘देव-त्रिरूप’ अशा दत्तात्रेयावर एक मधुर आरती रचलेली आहे. तित त्यांनी ‘निजसुखदायक’ अशा ‘देशिकनायका’ला (गुरु श्रेष्ठाला) भक्तिभराने ओवाळले आहे. कारण त्यांची अशी दृढ श्रद्धा आहे की-
रंगीं रंगुनि अनन्यभावें जे भजती।
अभिवंदुनि मग त्यांतें वोळंगति मुक्ती॥
श्रीधरांच्या प्रचंड गं्रथसंभारांत दत्तभक्तीचा धागा अनुस्यूत आहे. आपल्या या आदिगुरूच्या महात्म्यवर्णनासाठी ‘श्रीदत्तात्रेयमहात्म्य’ या नावाचे एक स्वतंत्र प्रकरण (ओव्या २६) श्रीधरांनी लिहिले आहे आणि अन्य ग्रंथांत प्रसंगाविशेषी त्यांचे मन दत्तचरणांचा वेध घेत राहिले आहे.
श्रीधरांनी एकनाथांप्रमाणेच दत्तात्रेयभक्तीमुळे आपल्या ‘रामविजया’त एक नवा प्रसंग कल्पिला आहे : वनवासाच्या प्रारंभकाळी अनेक ऋषींच्या आश्रमांना भेटी देत देत जेव्हा राम अत्रीच्या आश्रमात येतो, तेव्हा त्याला दत्तात्रेयाचे दर्शन होते. हा राम-दत्त-भेटीचा श्रीधराने दत्तमाहात्म्याने रंगवून टाकला आहे :
मग अत्रीचिया आश्रमाप्रति।
येती झाला जनकजापति।
तों देखिली दत्तात्रेयमूर्ति।
अविनाशस्थिति जयाची॥
सह्यद्रीवरी श्रीराम।
अज अजित मेघश्याम।
श्रीदत्तात्रेय पूर्णब्रह्म।
देत क्षेम तयातें॥
क्षीरसागरींच्या लहरिया।
कीं जान्हवी आणि मित्रतनया।
परस्परें समरसोनिया।
एक ठायीं मिळताती॥
कीं नाना वर्ण गाई।
परि दुग्धास दुजा वर्ण नाहीं।
तैसा जनकाचा जावाई।
आणि अत्रितनय मिसळले॥
अवतारही उदंड होती।
सवेंचि मागुती विलया जाती।
तैसी नव्हे दत्तात्रेयमूर्ति।
नाश कल्पांतीं असेना।
वरील उताऱ्यांत श्रीधरांनी दत्तात्रेयाचे अमोघ दर्शन, त्याचा निवास व विहार, त्याची परमपूजनीयता, त्याच्या अवताराची चिरंतनता आणि त्याच्या भक्तांचें सामथ्र्य इत्यादी गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. श्रीधरांच्या स्फुट कवितेतही त्यांची दत्तभक्ती प्रकटली आहे. श्रीधरस्वामी दत्तचरणांजवळ एकच मागणे मागतात :
दत्तात्रय श्रीगुरुदेवा।
श्रीब्रह्ममूर्ति तव पादसेवा।
अभंग हे तूं मजलागि देई।
ठेवीं तुझ्या श्रीधर नित्य पायीं॥
श्रीकृष्णदयार्णव यांनी लिहिलेल्या ‘हरिवरदा’ या प्रचंड दशमस्कंधटीकेंत गुरुपरंपरेच्या वंदनाच्या निमित्ताने सर्व अध्यायांच्या उपसंहारांत दत्तगौरव आलेला आहे. दयार्णवांचे प्रधान शिष्य उत्तमश्लोक यांनी ‘दत्तजननोत्साहवर्णन’ या नावाने एक लहानसे प्रकरण (ओव्या १२६) लिहिले आहे.
No comments:
Post a Comment