||ईश्वरभक्ती केलीच पाहिजे||
पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने ईश्वरभक्ती ही केलीच पाहिजे. याचे मूळ कारण मनुष्य हा ईश्वरच आहे. फक्त स्वतःच्या ईश्वरतत्वाचा विसर पडल्याकारणाने तो मायेच्या बाजारात भरकटत राहतो. या मायेच्या बाजारात म्हणजेच भ्रमाच्या बाजारात सामान्य माणूसच भरकटतो, असे नव्हे, तर मोठेमोठे अतिप्रसिद्ध महात्मे, शक्ती, व सिद्धिंच्या मागे लागलेले साधकही भरकटतात. सर्वसाधारणपणे मानवी जीवन व ईश्वर यांचा संबंध कसा आहे, हे कंदीलाच्या उदाहरणाने दाखविता येईल. कंदिलाचा सांगाडा म्हणजे हाडामासांचा मनुष्यदेह ! कंदिलाची काच म्हणजे सुक्ष्मदेह ! कंदिलाची ज्योत म्हणजे कारण देह ! व या ज्योतिचा प्रकाश म्हणजे परमेश्वरस्वरुप महाकारण देह ! दुष्कर्माने कंदिलाची काच काळी होते व त्यामुळे ईश्वरमय ज्योतिचा प्रकाश मानवी जीवनात पडत नाही. मनुष्याचे जीवन दुःखमय, संकटमय, कष्टमय व असमाधानकारक बनते. असा हा मनुष्य पुन्हा: पुन्हा जन्माला येतो व पुन्हा: पुन्हा मरतो. अखेरपर्यंत त्याला 'मी कोण आहे' हे कळत नाही. ईर्षा, द्वेष, मस्तर, अहंकार, स्वार्थ, लोभ, संकुचितपणा, सत्तेची हाव, संपत्तीचा लोभ, सामर्थ्याची लालसा, चमत्कार करून लोकांना आकर्षित करण्याची बुद्धी, समाजावर प्रभाव टाकण्याची वृत्ती, लोकांना उपदेश करण्याचा हव्यास, लोकांना फसविण्याची वृत्ती, सत्तेसाठी व पैशासाठी वाट्टेल ते करण्याची प्रवृत्ती या सर्व गोष्टी मनुष्याला 'स्वतःचे स्वरुप' कळण्यापासून, 'मी ईश्वर आहे' याची जाणीव होण्यापासून दूर घेऊन जातात. पुष्कळ वेळा असेही दिसून येते, की कष्टाने पैसे कमवून पोट भरणारा व ईश्वर चिंतनात रंगून जाणारा सामान्य मनुष्य तरुन जातो, तर लाख लोकांसमोर बसून ईश्वर या विषयावर प्रवचन देणारा किंवा अनेक चमत्कार करून समाजाला आपल्याकडे आकर्षित करणारा लाखो वर्षे अडकतो.
ईश्वरभक्ती, ध्यान-चिंतन, नामस्मरण, स्तोत्रपठन या गोष्टी नियामितपणे करत राहील्याने सुक्ष्मदेहावर चढलेली काळीकुटट आवरणे हळूहळू गळू लागतात. सुक्ष्म देह हळूहळू तेजस्वी होऊ लागतो. अंतरात्म्याच्या प्रकाशाची किरणे त्यातून बाहेर पडू लागतात. हळूहळू 'मी कोण आहे' हे जाणण्याची भूक लागते. थोडक्यात ईश्वराची ओढ लागते. ही ओढ जेव्हा खरीखुरी होऊ लागते तेव्हा पुढील मार्ग दाखविणारा कोणीतरी सदगुरु जरूर भेटतो. असे सदगुरु जेव्हा भेटतात तेव्हा नम्रतेने सेवा करावी लागते. खऱ्या सदगुरुनां पैशाने विकत घेता येत नाही, कुठल्याही गोष्टीने त्यांना आपण प्रभावित करु शकत नाही. ते तुमच्या अंत:करणातील भाव पाहात असतात. तो भाव जर शुद्ध असेल, तर तात्काळ तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडवून देतात व भाव जर अशुद्ध असेल, तर सेवा करत राहा म्हणून सांगतात.
जरी भाव असेल मायिक |
तरी देव होई महाठक |
नवल तयाचे कौतुक |
जैशासी तैसा ||
एका जन्मात स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेणे, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अवघड असले, तरी ईश्वरभक्ती करीत राहावी. हळूहळू स्वतःचाच म्हणजे ईश्वराचा शोध लागतो. यालाच ईश्वरप्राप्ती, असे म्हणतात.
||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
No comments:
Post a Comment