जीवाला सततचे खरे सुख केव्हा व कसे मिळेल ?
(सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या दृष्टीक्षेपातुन )
मानवी जीवनात अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा मानल्या जातात पण त्या शिवाय एक अत्यंत महत्वाची गरज असते ती सद्गुरू चरणां पाशी आश्रयाची. ती आधी प्राप्त झाली कि काहीही मिळवायचे रहात नाहीच तसेच या शिवाय जीवनात काहीही खरे समाधान मिळत नाही हेही तितकेच खरे.
आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्या करिता संतसंग करा आणि नामात रहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात.
शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरू करील. मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला ? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.
पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. . जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथ पर्यंत या म्हणजे तिथे गुरू उभाच आहे. पण उगीच काही न करता 'पुढे काय आहे ?' हे विचारण्याने काय होणार ?
जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरूला भागच पडते. वास्तविक, गुरू मनात काही इच्छाच येऊ देत नाही; म्हणून कामधेनू पेक्षाही गुरू श्रेष्ठ आहे.
गुरू तरी नाम हेच सत्य असे सांगतो, आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो . नाम हेच साधन आणि, होय तेच साध्य आहे हे अक्षरशः खरे आहे .गुरूने सांगितलेले साधन आपण पतिव्रते सारखे निष्ठेने जपले पाहिजे ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो, त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. गुरुआज्ञेप्रमाणे वागणार्याला कधीही नड येत नाही.
गुरूने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे. आणि त्यातच त्याला पाहावे, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरू दिसू लागतो; चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरू दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहात नाही, कारण मग वाईटाला जागाच राहात नाही. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे.
श्री गुरुंचे स्वागत (मानस पूजेने)
सर्वच पूजे मध्ये मानस पूजा श्रेष्ठ असल्याने मानस पूजेमध्ये खालील भाव मनात आणून त्यांचे पूजन करावे याला कुठलाही खर्च नाही .
आज श्री गुरु माझ्या घरी आले आहेत .पपई खडावा ,हातात दंड,आणि चेहऱ्यावर बाल सूर्याचे तेज असलेले माझे गुरुवर्य आज माझ्या घरी आले आहेत.ज्यांच्या मस्तकावर सुशोभित जटा आहेत.कपाळावर कस्तुरी चंदन मिश्रीत तिलक लावलेला आहे त्यामुळे त्यांचे विस्तीर्ण असे मुख कमल अतिशय देदीप्यमान दिसत आहे.असे गुरुवर्य आज माझ्या घरी आले.ज्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असून काखेला त्र्यिलोक्याचे रक्षण करणारी झोळी तर कासेला उपवस्त्र अशा रूपातील माझे गुरुवर्य आज माझ्या घरी आले आहेत.
कृष्णा नदीच्या तटाजवळील कुरु व्दिपात वास्तव्य असणारे परमपुरुष श्रीपाद योगी असे माझे गुरुवर्य आज माझ्या घरी आले आहेत माझे गुरुवर्य भक्त कल्प द्रुम आणि पूर्ण सचीतानंद दत्त दिगंबर असून जी गुरु परंपरा भगवान शंकरा पासून सुरु झाली आहे ते गुरुवर्य आज माझ्या घरी आलेआहेत.
अशा प्रकारच्या उत्कृष्ठ मानस पूजेने गुरुवर्य निश्चितच प्रसन्न होतील मग ............
स्वामी चरण जेथे , न्युन काय तेथे? समाधानाने रहावे .
सारांश म्हणजे सद्गुरूच्या जवळ एका आनंदा शिवाय दुसरे काहीही नसते म्हणून आयुष्यात जो पूर्णानंद मिळवायचा असतो त्याचा पूर्ण मनोमन आनंद मिळतोच.
आपल्या सद्गुरुनी नामरूपाने जी शक्ति दिली आहे, त्याची जाणीव होणे म्हणजे परमार्थ. अन त्या जाणिवेसाठी नामाचे अनुसंधान हवे. सद्गुरू आपल्याला सन्मार्गावर आणून आपली आत्मबुद्धी प्रकट करतात. मग प्रत्येक क्षण पूर्णा नंद बनतो. हा प्रवास नामा ने सुरू होत. ९ गुरू-आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत.सदगुरूच्या आज्ञेचे पालन करताकरता साधकाला नामाची गोडी लागते, आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. मग आता गुरू कृपा झाली की खरा आनंद दुसरीकडे शोधायची गरजच उरत नाही.
No comments:
Post a Comment