🍁 नाम घेणाऱ्याला उत्कटता हवी घराला आग लागल्यावर आत अडकलेला ज्या आर्ततेने वाचवा वाचवा म्हणून ओरडतो तशी आर्तता नाम घेताना असली पाहिजे.
🍁 शेतात धान्य पेरताना ज्याप्रमाणे कसेही पडले तरी झाड सरळ सरळच येते त्याप्रमाणे नाम कसेही घ्या त्याचा उपयोग समाधान मिळवण्यासाठीच होईल.
🍁 रोज कमीत कमी तीन तास नाम घ्यावे. या तीन तासांची दिवसभरात वाटणी आपल्या सोयीप्रमाणे करावी.
🍁 नामाची वेळ ठरवून ठेवावी, ती शक्यतो सांभाळावी. अपरिहार्य कारणाने वेळ चुकली तरी नामस्मरण चुकवु नये, इतर वेळी ते भरुन काढावे.योजलेली जपसंख्या संभाळावी.
🍁 नाम प्रेमाने उत्साहाने,निश्चयाने घ्यावे. नाम केवळ भगवंतासाठी. नामासाठीच घ्यावे. नाम हे परब्रह्म स्वरुप असल्याने नामाच्या मोबदल्यात कोणत्याही फळाची अपेक्षा करणे हे नामाला कमी लेखल्या प्रमाणे आहे.
प्रत्येक जीवाचे नामाचे माप ठरलेले असते. त्या जीवाची शुध्दी होण्यासाठी तेवढे पुरे व्हावेच लागते. म्हणून नाम चुकवू नये. चुकले तर भरुन काढावे. आधी नाम मग देहाचे काम.
🍁 आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे जसे आंधळ्याला समजत नसते तो भरीतच राहतो तसे नाम घ्यावे. तरच ते देहाच्या कणाकणात व मनाच्या अंतरंगात मुरते.
🍁 स्मरणाची प्रत म्हणजे नाम किती मनापासून येते. हे साधकाच्या हातात नसले तरी नाम घेणे हे नक्कीच त्याच्या हाती असते.तेवढे त्याने करावे.
🍁 नामस्मरणाला शरीराची अमुकच बैठक असली पाहिजे असे नाही. ज्यामध्ये नाम विनासायास चालते ते कोणतेही आसन चालते.
🍁 नामस्मरणाला 'अवेळ' अशी नाहीच. जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा नाम घ्यावे. तसेच माळेवर नाम घेणे सुलभ होत असेल तर माळ जरुर वापरावी.
🍁 रोज करावयाच्या नामजपाची संख्या ठरवून ती नेमाने रोजच्या रोज पुरी करीत जावी. त्याने मनाला वळण लागते. मात्र जपसंख्येचा अहंकार होऊ देऊ नये.
🍁 नाम सगुण असले तरी निर्गुणही आहे. त्यामुळे इतर सर्व आठवते नाम तेवढे आठवत नाही. आरंभी तर नामाला बसले की मनात इतर विचाराचे काहूर माजते थैमान चालते. नामाला बसण्यापूर्वी हातपाय धुवावेत. चुळ भरावी. डोळ्यांना पाणी लावावे. सद्गुरुंची तसबीर पुढे ठेवून तिकडे पुनः पुनः पहात नाम घ्यावे. कांही वेळ मोठ्याने नाम घ्यावे ते आपल्या कानांनी ऐकावे.
🍁 नाम गोड आहे ते घेणे माझ्या कल्याणाचे आहे. मी नाम घेत राहीलो तर खास तरुन जाईनच. मला सद्गुरु लाभले, त्याच्या कृपेने मला नाम मिळाले ही नरदेहात महद्भाग्याची गोष्ट आहे. त्याबद्दल सद्गुरुबद्दल कृतज्ञता, आता मी सर्वस्वी तुमचा आहे. अशी त्यांचे पायी संपूर्ण शरणागती. यापैकी काहीतरी भावना मनात सतत बाळगुन नामस्मरण केले तर अधिक प्रसन्नतेने आणि एकाग्रतेने होते.
No comments:
Post a Comment