Friday, August 31, 2018

श्री दत्तजन्म कथा




श्री दत्तजन्म कथा
अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता साध्वी स्त्री होती. ती आश्रमांत पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवां करित असे. तसेच आश्रमांत येण्याऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने आदरानें स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धां तिला भिऊन वागे; अग्नि तिच्यापुढें शीतल होई; पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिचपुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याच्या प्रभाव ! पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ति लोकांबद्दलअसलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नांव 'साध्वी पतिव्रता स्त्री' म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धा कानांवर गेल्या शिवाय राहिली नाही. नारदांचे नांवच मुळी' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला (विष्णूची पत्नी) सांगितली, पार्वतीपुढे (शंकराची पत्नी) अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गाइले, सावित्रीपुढे (ब्रह्मदेवाची पत्नी) तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हां साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव आपण देवी. तेव्हां या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाहीं. तेव्हां हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनांत विचार आला आणि हा विचार त्यांनीं आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हां त्यात्रैमूर्ति (ब्रह्मा-विष्णु-महेश) क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या- "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकांत यवयास निघाले.त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातांत कमंडलू अशा थाटांत ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमांत आले. भर दुपारची वेळ ! ऊन मी म्हणत होते. अशा वेळीं आपल्या आश्रमांत आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले- "आम्हीलांबून आलो असून, तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हांस इच्छा झाली आहे की, तू नग्न होऊन आम्हांस अन्न वाढावे.
आसनी बैसतां सत्वर म्हणती क्षुधा लागली फार ।नग्न होऊनि निर्धार इच्छाभोजन देइंजे
हे वचन ऐकतांच अनुसूया चिंतन करीत मनांत म्हणाली- 'हे कोणी कारणिक पुरुष माझें सत्त्व पाहाण्याकरिता आले असावे. यांस जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानिहोईल. माझें मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचें तपःसामर्थ्य माझ्यामागे आहे.' असें मनांत आणून सती म्हणाली, -
"
थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेंच करितें.''एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरांत गेली. त्या वेळीं तिचे पति देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यांस ही सारी कथा निवेदन केली. तेव्हां मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले आपल्या पत्नीस एका पंचपात्रांत गंगोदक देऊन म्हणाले, - "हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव त्यांना इच्छाभोजन दे.त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले
पाळण्यातील बाल स्वरूपातील दत्तमहाराज 
हें जाणोनियां मानसीं तीर्थगंडी देई कांतेसी गंगा प्रोक्षूनि तिघांसी भोजन देई जाण पां
तेव्हां पतीच्या आज्ञेप्रमाणें ती तीर्थाची पंचपात्री हातीं घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली, हातांतील गंगोदक त्या तिघांवर उडविलें. तो काय? त्या गंगोदकाचा स्पर्श होतांच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक! अगदीं लहानतीं तीन गोजिरीं गोजिरीं बालकें पायांजवळ लोळूं लागलीं. तेव्हां अनुसूयेनें तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतलें आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणें-
कंचुकोसहित परिधान फेडूनि ठेवी लगतां क्षण नग्न होवोनियां जाण बाळांजवळी बैसतसे
बाळें घेऊनि मांडोवरी स्तनीं लावी जेव्हां सुंदरी पान्हा फुटला ते अवसरी देखोनि सती आनंदे
अशा तर्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघां अतिथींची बालकें झाली ती बालके रडू लागली. तेव्हां त्यांना भूक लागली असेल असें समजुन अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली त्यांना पाळण्यांत घालून थोपटून निजविलें. असें या पतिव्रत्याचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली. पण हीं तिन्ही बालके. मात्र आहेत त्याच स्वरूपांत राहिली. असें होतां होतां एकदां नारदमुनीचीं स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमांत आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हां त्यांच ठिकाणीं ती तीन बालके ( ब्रह्मा-विष्णु-महेश ) रांगत खेळत असतांना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते कांहीच बोलले नाहींत. अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकीं आले ही गोष्ट त्यांनीं लक्ष्मी, पार्वती सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या.
ऐसें सांगता ब्रह्मपुंत्र तिघी मिळाल्या एकत्र जोडोनियां पाणिपात्र नारदासी विचारिती
तेव्हां त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, 'हे मुनिवर, आम्हांला त्या अत्रिमुनींच्या आश्रमांत घेऊन चला. म्हणजे आम्ही आपापले भ्रतार (पति) परत शोधून घेऊन येऊं. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकुन झालेली सारी कथा निवेदन केली अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेस दया येऊन तिनें हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हां अत्रिमुनींनी फिरून गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले.तेव्हा हातांत तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हां तीं बालकेंपूर्ववत् देवस्वरूप झाली. ब्रह्मा- विष्णु- महेश. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनीं देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णु, शंकर, ब्रह्मदेव, प्रसन्न झाले म्हणाले, "हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग !" तेव्हां अनुसूयेने 'तिघे बालक (ब्रह्मा - विष्णु- महेश) माझ्या घरीं तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाने राहूं देत' असा वर मागितला. तेव्हा 'तथास्तु' असें म्हणून देव अंतर्धान पावले. आणि बालक रूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात,
बाल स्वरूपातील दत्तमहाराज अत्रि आश्रमात
मासांमाजीं मार्गेश्वर उत्तम महिना प्रियकर तिर्थीमाजीं तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पैं॥
वार बुधवार कृत्तिका नक्षत्र ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र तिघे मिळोनि एकत्र शुद्ध सत्त्व निवडिलें
त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन मूर्ति केली असे निर्माण ठेविते झाले नामभिघान दत्तात्रेय अवधूत
अशा तर्हेनें मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय ! तेव्हांपासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकालीं दत्ताच्या देवालयांत दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी १२ वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो.
श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.


No comments: