९) विश्वंभरावधूत
पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला.
जन्म:- चैत्र शुद्ध १५
श्री अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी बदरिकाश्रमांतील सिध्दजन व भक्तजनांच्या कल्याणासाठी श्रीविश्वंभरावधूत या नावाचा अवतार घेतला. बरिकाश्रमी राहून खडतर तपश्चर्येने सिध्दिसंपन्न झालेल्या भक्तजनांवर अनुग्रह करण्याकरिता ज्ञानसागर रुपाने प्रकट होऊन त्यांच्या अहंकाराचा परिहार करुन व सदुपदेशाने त्यांच्या अज्ञानरुपी तिमिराचा नाश करुन त्यांना सदाचाराचे वळण लावले. यानंतर बराच काळ निघून गेल्यावर दत्तात्रेय यांना त्यांचे स्मरण झाले. ते सर्व सिध्दजन माझ्या उपदेशाप्रमाणे बागून उत्तम गति प्राप्त करुन घेण्याच्या स्थितीत आले आहेत की नाहीत, हे पाहण्याची दयासागर दत्तात्रेयांना इच्छा झाली.
सद्गुरु केवळ उपदेश करुन थांबत नसतात तर आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे वागून साधक हे उत्तम गतीच्या दिशेने उत्तरोत्तर प्रगमनशील वाटचाल करीत आहेत की नाहीत हे परीक्षूण पाहण्यासाठी भक्तजनांना वारंवार भेटी देतात व त्या भेटीतून पुन:पुन: सदुपदेशाचा लाभ देऊन साधकाला ते कृतार्थ करतात.
श्री दत्तात्रेय यांनी बदरिकाश्रमांतील सिध्दजनांची परीक्षा घेण्याचे ठरविले. निर्मळ ब्रम्ह देखील भक्तजनांची परीक्षा पाहण्याकरीता मळकट रुपाने अवतरले. या सर्व भक्तांना पूर्वी आपण मंत्रानुष्ठानाचा मार्ग दाखवला होता. बदरिकाश्रमातील आपल्या भक्तांच्या हातून ही सर्व अनुष्ठाने व्यवस्थित पार पडत आहेत की नाहीत, ते पाहण्यासाठी मंगलमय अवधूत अमंगल रुपात अवतरले. त्यांनी एक विचित्र वेष धारण केला व बदरिकाश्रमात प्रवेश केला. म्लेच्छारुपाने अवतरलेल्या दत्तात्रेय यांनी मात्र सर्व सिध्दांचे निरीक्षण केले आणि त्या सिध्दांच्या समाजात ध्यानमुद्रेने ते शांतपणे एका बाजूला बसले. त्या वेळेला काही लोक चित्ताचा स्वरुपी लय करुन बसले होते, तर काही चंचल चित्ताने थटटामस्करी करीत बसलेले होते. काही एकमेकांवर संतापलेले होते तर काही दु:खित व कष्टी होऊन बसलेले होते. काही ग्राम्य गोष्टींच्या चर्चेत दंग होते, तर काही लोकांना कामक्रोधादि विकारांनी ग्रासून टाकलेले होते. काही लोक पूर्वी अभ्यासलेल्या ध्यानयोगाच्या बळावर ध्यानसमाधीमध्ये निमग्न होऊन बसलेले होते.
दयानिधी दत्तात्रेयांनी हा प्रकार पाहिला. त्यांचे मन कृपेने कळवळले. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी दत्तात्रेयांनी त्या सर्वाची मने आपल्याकडे वळवून घेतली तेव्हा ते सिध्द महात्मे आपापली कर्मे सोडून निश्चलपणे व एकटक दृष्टीने दत्तात्रेयाकडे पहातच राहिली. दत्तात्रेय पूर्वीप्रमाणे आपल्याला सोडून जातील या भितीने त्यांची मने घाबरुन गेली होती, त्यामूळे दत्तांत्रेय बसले की ते बसत व दत्तात्रेय उठले की ते ही उठत. अशा रितीने ते दत्तात्रेयांचे अनुकरण करु लागले. त्या सर्व सिध्दांनी दत्तात्रेयांना प्रश्न केला की, "तुम्ही कोण आहात?" यावर दत्तात्रेयांनी मागील अवताराप्रमाणे उत्तरे देण्यास प्रारंभ केला. दत्तात्रेयांचे उत्तर ऐकूण सिध्दलोक आपआपसात बोलू लागले की, हा पूर्वीच आपल्याला दर्शन देणारा व उपदेश देणारा दत्तात्रेय तर नसेल ना यावर काही सिध्दलोक भानावर येऊन म्हणाले की, हा खरोखर तो सिध्दराज ज्ञानसागर भगवान श्री दत्तात्रेयच आहे.
आता सिद्धांची पुनः परीक्षा घेण्याची वेळ होती. सिद्धांनी किती प्रगती केली आहे हे श्रीगुरूंना पहायचे होते. श्री दत्तप्रभूंनी यांनी म्लेंच्छाचे (क्रूर मांसाहार करणारा - खाटिक /कसाई) रूप धारण केले. त्याचा चेहरा राकट होता. त्याने गळ्यामध्ये ताईत बांधला होता, त्याच्या हातात एक वाकडीतिकडी काठी होती आणि एक काळा कुत्रा त्याच्या मागे मागे चालत होता. अशा अवतारात हा म्लेंच्छ त्या सिद्ध लोकांजवळ पोहोचला. त्याने पाहिले की काही सिद्ध ध्यान करीत होते, तर काहीजण विनोद करीत होते आणि इतर काही दुःखाने ग्रस्त होते. सहाजिकच त्याकडे सिद्धांचे लक्ष गेले परंतु यावेळी प्रभूंची लीलाच वेगळी होती. ह्यावेळी ते तेजोमय कुमार नव्हते आणि अचंबित करण्यासाठी हवेतही नव्हते. त्यामुळे केवळ हे विचित्र बाह्यरूप पाहून सिद्ध नेहमीप्रमाणे त्यांना प्रश्न विचारू लागले पण श्रीगुरूंनी त्यांस त्यांच्या पहिल्या शैलीत उत्तर दिले. ती उत्तरे ऐकून त्या सर्वाना कळून चुकले की हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तात्रेयच आपली परीक्षा पाहण्यासाठी पुन्हा आले आहेत. पश्चात्तापदग्ध ते सर्व दत्तगुरूंना शरण गेले. मग मात्र दत्तात्रेय त्यांच्या नेहमीच्या रूपात प्रकट झाले आणि बाह्य स्वरूपावर न जाता त्याच्या तत्व स्वरूपावर ध्यान करण्याचे मार्गदर्शन त्यांनी सर्वांना केले. हा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, चित्रा नक्षत्रावर, दुसऱ्या प्रहरावर झाला.
म्लेंच्छरूपा महावदना | सर्पकरदंडधारका ||
विश्वंभरावधूताय
| दत्तात्रेयाय नमो नम: ||
म्लेंच्छरूप धारण केलेल्या, अक्राळ विक्राळ तोंड असलेल्या, हातात (सापासारखा) वाकडीतिकडा दंड धरलेल्या विश्वंभरावधूत श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
(विश्वरूप अवतारात सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णांचे असेच काहीसे रूप दिसत होते - ती अक्राळ विक्राळ तोंडे सर्व सृष्टीचा घास करून भक्षण करीत होती. त्याला काळाचे परीमाण नव्हते. प्रत्यक्ष कालसर्पच त्याने धारण केला होता. मायेने नटलेला माझा गुरू विश्वंभर ही आहे आणि मायेच्या पलिकडचा अवधूतसुद्धा आहे. त्यांचे करावे तेव्हढे वर्णन कमी आहे)
१०) मायामुक्तावधूत
भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी 'मायामुक्तावधूत' या नावाचा दहावा अवतार घेतला.
जन्म:- वैशाख शुद्ध १४
श्री दत्तात्रेयांचा दहावा अवतार- मायामुक्तावधूत
वैशाख शुद्ध चतुर्दशी च्या दिवशी, मध्यान्हीच्या वेळी श्रीगुरू एका भिक्षुकाच्या रूपात, आपल्या प्रिय भक्त शील च्या घरासमोर प्रकट झाले. त्यांचे हे अवताररूप फार सुंदर आणि तेजस्वी होते. त्यांच्या गळ्याभोवती रूद्राक्षांच्या माळा होत्या. त्यांच्या हातात एक भिक्षा पात्र होते आणि उजव्या हातात एक दंड होता. शीलच्या घरात त्यावेळी श्राद्धकार्य चालू होते आणि त्यासाठी त्यांनी ब्राम्हणांना आमंत्रित केले होते. ब्राम्हणांना या भिक्षुकाला पाहून राग आला. त्यांनी त्या भिक्षुकाला विचारले, "तु कोण आहेस?" "मी
अजिंक्य, अविनाशी, सर्वावस्थांच्या पलिकडे असलेला अवधूत आहे!". त्यांचे हे उत्तर ऐकताक्षणीच शीलला कळून चुकले की हे गेल्या अवतारातील सिद्धराज ज्ञानसागर आहेत. तथापि शाश्वती होण्यासाठी, शीलने त्यांना विचारले, "आपण कोठे आश्रय घेता आणि आपले गुरू कोण आहेत हे कृपा करून सांगावे?"
यावर भिक्षुकाच्या रूपातील श्रीगुरू म्हणाले, "माझे निश्चित निवासस्थान कोण्या विशिष्ट जागी नाही. माझा कोणीही गुरू नाही उलट मीच या त्रैलोक्याचा स्वामी आहे." हे उत्तर ऐकताच शील ची हेच आपले सद्गुरू दत्तमहाराज असल्याची खात्री झाली. तो त्यांना मनोभावे शरण गेला. त्याने श्रीगुरूंना यथोचित आसनावर बसवून, पाद्यपूजादी करून योग्य सन्मान केला. त्यांना उत्तम नैवेद्य अर्पण केला.
हे सर्व जमा असलेले ब्राम्हण पाहत होते. श्राद्धाचे भोजन त्या भिक्षुकाला दिल्याचे पाहून त्यांना अधिकच राग आला. शीलने केलेले हे कार्य धर्मसंमत नाही असे सांगून त्यांनी शीलला दुषणे दिली. यावर श्रीगुरूंनी त्या ब्राम्हणांना विचारले, "ब्रम्ह म्हणजे काय हो?". "हे
विचारणारा तु कोण? ॐ हेच परब्रह्म आहे आणि त्यानेच वेदांचे रूप धारण केले. पण तु अपवित्र आणि अ़धर्मी आहेस. त्यामुळे तुला वेद ऐकण्याचा पण अधिकार नाही." अहंकारी ब्राह्मण उत्तरले. संन्यासी यावर बोलले, "मी मायेच्या प्रभावाच्या पलिकडला आहे, म्हणूनच सामान्य जगतातील कुठलेही नियम मला लागू पडत नाहीत. वेदात विषद केलेली कर्मे ही तीन प्रकारची आहेत आणि हे जग सुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि हे सर्व माझ्यासोबतच्या ह्या काळ्या श्वानाच्या रूपातच आहे. माझा हा कुत्रा सर्वच वेद-शास्त्रांमध्ये पारंगत आहे, हाच तुमचे समाधान करेल." असे बोलून त्यांनी कुत्र्यास वेद बोलण्याची आज्ञा दिली. आज्ञा होताच तो कुत्रा शिकलेल्या पंडितासारखा वेद बोलू लागला. सर्व उपस्थित ब्राह्मण हा चमत्कार पाहून स्तब्ध झाले. अवधूतांनी मग शीलच्या पितरांनाही पाचारण केले आणि ते सर्व ज्योतिरूपाने श्रीगुरूंमध्ये समाविष्ट झाले. झाला प्रकार पाहून ब्राम्हणांचा वृथा अभिमान पूर्ण गळून पडला आणि ते सर्व श्रीगुरूंना शरण गेले. श्रीगुरूंनी त्यांना भक्तिमार्गाचा उपदेश केला.
पाणीपात्रधराय
त्वं |
श्वानसहिता शीलरक्षका ||
मायामुक्तावधूताय
|
दत्तात्रेयाय नमो नम: ||
पाणी (संस्कृत शब्द - अर्थ - हात) म्हणजे हातात भिक्षा पात्र धारण केलेल्या, सोबत श्वान असलेल्या, शील नावाच्या भक्ताचे (ब्राह्मणाच्या क्रोधापासून तसेच संसारगर्तेत बुडण्यापासून) रक्षण करणार्या, मायामुक्तावधूत अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
११) मायायुक्तावधूत
दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते. ही योगमाया होती.
जन्म:- जेष्ट शुद्ध १३
श्री दत्तात्रेयांचा अकरावा अवतार - मायायुक्तावधूत।
जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला, स्वाती नक्षत्रावर, शुक्रवारी, सूर्योदयाच्या वेळेस हा अवतार झाला.
श्रीप्रभू एका तरूण तपस्व्याच्या रूपात प्रकट झाले. त्यांचे सोबत त्यांच्या डाव्या मांडीवर एक तरूण युवती बसली होती. त्यांचे हे रूप पाहून, साक्षात लक्ष्मी नारायणच प्रकट झाले आहेत असे समजून सर्वजण त्यांना शरण गेले आणि आपापल्या सांसारिक विवंचना त्यांचापुढे विषद करू लागले. परंतु एकाही दर्शनार्थीने अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी रूचि दाखवली नाही. श्रीगुरूंनी मग एक लीला केली, ते सोबत असलेल्या तरूणीसोबत नृत्य गायन करू लागले. परंतु हे तर श्री दत्तात्रेय आहेत आणि ते आपल्या मायेसोबत खेळत आहेत, असे समजून लोकांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. श्रीगुरूंनी मग मद्य, मदिरादि विषयसेवन त्या तरूणीसोबत सुरू केले आणि ते म्हणाले, "मी हे असे विषयसेवन करत आहे त्यामुळे तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याची पात्रता आणि सामर्थ्य आता माझ्यात नाही." त्यांचे हे वचन ऐकताच उपस्थितांपैकी बरेच लोक निराश झाले आणि परत माघारी फिरले. पण काही शिष्य मात्र श्री गुरूंच्या त्यारूपातसुद्धा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिथे तसेच थांबले. त्यांची ती निष्ठा पाहून श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या उपस्थित भक्तगणांना उपदेश केला, "श्रद्धा, भक्ति, ध्यान - धारणा, शमदमादि नियमांचे पालन आणि षड्रिपूंवर विजय मिळवूनच संसारबंधनातून मुक्ति मिळू शकते!"
यानंतर मायायुक्तावधूत नमर्देच्या उत्तर तटाने फिरत फिरत माहूरगडापर्यंत पोहोचले. येथे त्यांना जंभासूरापासून त्रस्त झालेले देवगण, कार्तवीर्य सहस्त्रार्जुन आणि परशुराम भेटले. श्रीगुरूंनी मग परशुरामांना क्षत्रिय वधाच्या दोषापासून मुक्त होण्यासाठी आणि मनःशांतीसाठी 'त्रिपुरा रहस्य' विषद केले.
अनघालक्ष्मीसहिताय
|
मायारूपप्रदर्शका
||
मायायुक्तावधूताय
|
शार्दुलाय नमो नम:||
श्रीगुरंसोबत असलेली त्यांची ही शक्ति मायारूपिणी देवी अनघाच होती. ह्या अनघालक्ष्मींच्या सोबत नित्य असलेल्या, आपले मायारूप दाखवणाऱ्या, मायायुक्तावधूत अवतार धारण करणाऱ्या श्री शार्दुलांना माझा नमस्कार असो
१२) आदिगुरु
सद्गुरु श्रीदत्तात्रेय भगवान यांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने ओळखला जातो. मदालसेचा धाकटा पुत्र जो अलर्क, त्याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता दत्तात्रेयांनी जो अवतार घेतला, त्याला आदिगुरु असे म्हटले आहे.
जन्म:- आषाढ शुद्ध १५
राजा म्हणून राज्य करताना, मदालसेचा पुत्र अलार्क हा अनेक संसारिक सुखांमध्ये तल्लीन झाला होता. त्याचा मोठा भाऊ, सुबाहू हा ज्ञानी होता. आपला भाऊ या वासंनांच्या पाठी आपले जीवन व्यर्थ घालवत आहे असे सुबाहूस वाटले. त्याला आध्यात्मिक दृष्टीने जागृत करण्याच्या उद्देशाने तो त्याच्या नगरात आला आणि संपत्तीमध्ये त्याने आपल्या वाटा मागितला. अलार्कने जेव्हा ते नाकारले तेव्हा सुबाहूने काशी राजाच्या मदतीने त्याच्या नगरावर हल्ला केला आणि त्याचे राज्य चहू बाजूंनी घेरले. परिणामी नगरात येणाऱ्या तरतुदी थांबल्या. यामुळे प्रजाजनांना अन्नधान्य मिळू शकले नाही आणि ते उपासमारीने ग्रस्त झाले. ही प्रतिकूल परिस्थिती पाहता अलार्क निराश झाला. तेव्हा त्याला त्याच्या आईने मदालसेने त्याला लिहिलेल्या पत्राची आठवण झाली जे त्याच्या आईने त्याला आणीबाणीच्या प्रसंगी वाचण्यास सांगितले होते. अलार्कने कसेबसे नगर सोडले, जंगलात प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जवळची पेटी उघडून त्यातील आपल्या प्रिय आईचे पत्र पाहिले. त्यात असे लिहिले होते की,' संकटांच्या काळात इतर विचारांचा त्याग करावा आणि संत शरण जावे आणि आत्मकल्यानाचा विचार करावा. माहूरगडावर पवित्र वास्तव्य करणाऱ्या परमगुरू श्री दत्तात्रेयांना शरण जावे.' आध्यात्मिक मार्गदर्शनापर्यंत त्याला श्री दत्तावर जायला हवे.
अलार्कने माहूरला जाऊन श्री दत्तात्रेयांची शरणागती पत्करून आपले दुःख सांगितले. श्री दत्तात्रेयांनी त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि विचारले, "हे दुःख तुझे आहे का? फक्त त्याआधी तु कोण आहेस याचा विचार करावा". या एका प्रश्नामुळे अलर्कच्या बुद्धीत प्रकाश पडला. त्याने स्वत: चा विचार करण्यास सुरवात केली. त्याच्या अज्ञानाचा नाश झाला आणि त्याचा अहंकार आणि लोभ देखील नाहीसा झाला तसेच शत्रुत्वाची भावना देखील विलुप्त झाली. ज्या अवतारात श्रीगुरूंनी अलार्कला उपदेश केला तो हा आदिगुरू अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, पहिल्या प्रहरी, पहिल्या मुहूर्तावर झाला.
मदालसात्मजवरदा
| शाश्वतज्ञानप्रदायका ||
आदिश्रेष्ठा अभयहस्ता | दत्तात्रेयाय नमो नम:||
मदालसेच्या आत्मज म्हणजे मुलाला वरदान देणाऱ्या, त्याला शाश्वत ज्ञान देणाऱ्या, सर्वश्रेष्ठ अशा अभय प्रदान करणार्या (आदिगुरू अवतार धारण करणाऱ्या) माझ्या दत्तगुरूंना माझा नमस्कार असो.
मदालसेचा पुत्र अलर्क राज्यकारभार पहात असता राज्यवैभवामध्ये त्याचे मन गुंतून गेले. त्याला आईने उपदेशिलेल्या ध्यान, धारणा, तत्वज्ञान व वैराग्य या सर्व गोष्टींचा विसर पडला. अलर्काचे जीवन कुत्र्या-मांजरा प्रमाणे विषयभोगात वाया जाऊ नये या पवित्र हेतुने अलर्काचा भाऊ सुबाहु याने काशिराजाचे साहाय्य घेऊन अलर्कावर स्वारी केली. अलर्काच्या राजधानीला वेढा दिला व बाहेरची रसद बंद केली. अलर्क राजा मोठा दयाळू व धार्मिक होता. तो धर्माने पैसा मिळवीत होता व पैशाचे धर्माचे आचरण करीत होता. पैसा आणि धर्म या दोहोच्या समन्वयातून तो संपूर्ण राज्यवैभवाचे सुख भोगीत होता. तो प्रजाजनांचे पित्याप्रमाणे परिपालन करीत होता.
रसद थांबल्याने आपल्या प्रजाजनांची आपल्या डोळयांदेखत हात असलेली उपासामार पाहून त्याला अत्यंत दु:ख झाले. संकटाच्या वेळी उपयोगाला यावी म्हणून त्याच्या मातेने त्याच्याजवळ गुप्तसंदेश पेटी ठेवलेली होती व सांगितले होते की, अगदी अपरिहार्य संकटाच्या वेळी ही तू उलगडून पहा म्हणजे तुला संकटांतून मुक्त होण्याचा मार्गहि दिसेल. या गोष्टीची आठवण होताच अलर्काने ती उघडून पाहिली व तीमध्ये मातेने लिहिलेला उपदेश एका सदाचारसंपन्न अशा अधिकारी ब्राम्हणाकडून वाचून घेतला. त्यात लिहिले होते की,
"दुसऱ्यांची संगति सर्वस्वी टाळावी. ती टाळता येत नसेल तर सज्जनांची संगति करावी. संत हे दुर्जनांच्या संगतीचा दुष्परिणाम टाळण्याचे उत्तम औषध होय. कोणत्याहि गोष्टीची इच्छा करु नये. अर्थात सर्व कामना सोडून द्याव्यात. त्या जर सोडून देता येत नसतील तर मुक्त हेाण्याची कामना अंत:करणात ठेवावी. मुक्त होण्याची कामना ही सर्व कामनांच्या दुष्परिणामांचे उत्तम औषध होय."
उत्तम संत कोण भेटेल व कोठे भेटेल याचे उत्तर त्या सहृदय मातेने देऊन ठेवलेलेच होते. हा सर्व मातेचा हार्दिक म्हणजे कळवळयाचा संदेश ऐकून राजा अलर्क दत्तात्रेयांचा शोध करण्याकरिता सहयाद्री पर्वताच्या परिसरात आला व उत्तम संत भगवान श्रीदत्तात्रेयांचा शोध करु लागला. भक्तवत्सल भगवान श्रीदत्तात्रेय यांनी मायायुक्तअवधूत रुपाचा त्याग करुन आदिगुरुंचे रुप धारण केले, व त्याच रुपाने अवतरुन राजा अलर्काला दर्शन दिले. आदिगुरु दत्तात्रेय यांना पाहताच त्यांच्या चरणी अलर्काने साष्टांग प्रणिपात केला व करुणापूर्ण वाणीने अनुग्रहाची प्रार्थना केली.
आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीदत्तात्रेय हे आदिगुरुच्या रुपाने अवतरले. तो दिवस शनिवारचा होता. त्या दिवशी पहाटे पहिल्याच प्रहरातील दुसऱ्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीदत्तात्रेय आदिगुरुंच्या रुपाने प्रकट झाले. दयासागर श्रीदत्तात्रेय यांनी अलर्काच्या मुखातून सर्व दु:खाची कहाणी ऐकली. हा आपला अनन्यभक्त असलेल्या मदालसेचा पुत्र आहे. कयाधूच्या उदरी प्रल्हादासारखे जसे पुत्ररत्न निर्माण झाले त्याचप्रमाणे मदालसेच्या उदरी जन्माला आलेले हे एक पुत्ररत्नच आहे असे समजून आदिगुरु श्रीदत्तात्रेय यांनी अलर्काचे सांत्वन केले. त्यांनी अलर्काला उपदेश केला. त्यांचा आशीर्वाद घेऊन राजा अलर्क आपल्या राजधानीला परत आला. सर्व राज्य त्याने सुबाहूच्या स्वाधीन केले. साष्टांग नमस्कार करुन तो एकांतामध्ये आनंदाने आत्मस्वरुपाचे चिंतन करण्यासाठी निघाला. अलर्काची ही वैराग्याची व आत्मज्ञानाची परिपक्वावस्था पाहून सुबाहूला अत्यंत संतोष वाटला. त्याने ते सर्व राज्य परत अलर्काच्या स्वाधीन केले. निरपेक्ष बुध्दीने अनासक्त राहून तूच हे सर्व राज्य नीट संभाळ असे सांगून व अलर्काला आशीर्वाद देऊन आपला हेतु सफल झाल्याचे समाधान मानीत काशीराजासह तो आपल्या मार्गाने परत गेला. अशी ही आदिगुरु दत्तात्रेय यांच्या बाराव्या अवताराची कथा आहे.
१३) शिवरुप
एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा 'शिवरुप' नावाचा तेरावा अवतार.
जन्म:- श्रावण शुद्ध ८
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभु यांचा तेरावा अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या
नावाने ओळखला जातो.
पिंगळांग नावाचा एक वेद-शास्त्रांमध्ये पारंगत असलेला ब्राह्मण माहूर येथे राहत होता. एकदा त्याने पाहिले की एक तेजस्वी दिगंबर युवक कृष्णाम्लाच्या वृक्षाखाली पाहिला. त्याच्यासोबत एक दिगंबर तरूणीदेखील होती आणि तो वेदांचे उच्चारण करत होता. ते पाहून पिंगळांग अचंबित झाला. त्याने त्या युवकाला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. "तू कोण आहेस? तू सुसंस्कृत दिसत नाहीस पण तुला वेद येत आहेत. तू ब्रम्हचाऱ्यांसारखा दंडधारी नाहीस किंवा तुझ्याकडे गृहस्थ माणसे ज्याचे आचरण करतात ते अग्निहोत्र देखील नाही. संन्यासधर्म धारण करण्याचे तुझे वयही दिसत नाही. मग नक्की तुझा आश्रम तरी कोणता?" यावर तो युवक म्हणाला," हे संपूर्ण जगच आत्मरूप आहे. माझा पंचाश्रम आहे, जो सर्वत्र आत्मस्वरूपच पाहतो." त्याचे हे उत्तर ऐकताच पिंगळांगाला कळून चुकले की हे तर साक्षात अनसूया नंदन श्री प्रभू दत्तात्रेय आहेत. त्याने विनम्रतेने श्रीगुरूंना वंदन केले आणि आत्मकल्याणासाठी उपदेश करण्याची विनंती केली. हा अवतार सोमवारी, श्रावण शुद्ध अष्टमीला झाला.
आत्मरूपनिदर्शकाय
| पञ्चाश्रमविधायिने
||
दत्तात्रेय शिवरूपाय | शार्दुलाय नमो नम:||
आपल्या सहज बोधाने आत्मरूपाची अनुभूती घेण्याचा निर्देश करणाऱ्या, सामान्य माणसाच्या चार आश्रमव्यवस्थेंच्या पलिकडे असणाऱ्या (जेथे सामान्य मनुष्याचे नियम लागू पडत नाहीत कारण तेथे केवळ आत्मरूप दृष्टी असते), शिवरूप दत्तात्रेयांना माझ्या शार्दुलांना माझा नमस्कार असो.
१४) देवदेवेश्वर
दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे.
जन्म:- भाद्रपद शुद्ध १४
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला, शततारका नक्षत्रावर, शुक्रवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस श्रीगुरू, नर्मदा नदीच्या तीरावर माहूरच्या जंगलात अवतरीत झाले. ब्रम्हदेवादी सर्व देवता, गौतम ऋषींचे पुत्र शतानंद महर्षी इत्यादी सर्व श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. याकाळात श्रीगुरूंनी नर्मदा नदीमध्ये तसेच आसपासच्या अनेक तीर्थांमध्ये स्नान केले आणि इतर अनेक ऋषी-मुनींना दर्शनही दिले. कृष्णाम्लाच्या वृक्षांनी हा परिसर परिपूर्ण असल्याने या स्थानाला 'कृष्णाम्लाकी तीर्थ' असे नाव पडले.
कृष्णाम्लाकीनिवासाय | सर्वकल्याणकारका ||
देवदेवावताराय
| दत्तात्रेयाय नमो नम: ||
कृष्णाम्लाकी तीर्थाच्या परिसरात निवास करणाऱ्या, सर्वांचे कल्याण करणाऱ्या, देवदेवावतार धारण केलेल्या माझ्या श्रीगुरू दत्तात्रेयांना नमस्कार असो.
सदगुरु भगवान दत्तात्रेय यांचा चौदावा अवतार देवदेव अथवा देवदेवेश्वर या नावाने ओळखला जातो. मार्कडेय ऋषिंनी सांगितलेली कथा आहे. माहूर क्षेत्राच्या परिसरात विशेषत: शतानंदाला दर्शन देऊन अनुगृहित करण्यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय हे देवदेवेश्वराच्या रुपाने प्रकट झाले. याच अनुषंगाने स्वर्गातील इंद्रादि देव आणि सत्य लोकातील ब्रम्हदेव यांनाही दर्शन देऊन अनुगृहित करण्याचे कार्य देवदेवेश्वर प्रभूंनी केल्याचे पहावयास सापडते. भगवान श्रीदत्तात्रेय नर्मदेच्या दक्षिण तीरावरील अरण्यातून दक्षिण दिशेने प्रवास करीत करीत अतिप्राचीन अशा व सर्व पर्वतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सहयाद्री नावाच्या पर्वताजवळ आले. प्रवासामध्ये अनेक ऋषिमुनींचे आश्रम पाहात पहात त्यांनी तेथील ऋषिमुनींना आपल्या दर्शनाने पावन केले. अनेक नदया, तीर्थे व इतर जलाशय यांच्यामध्ये अवगाहन करुन त्यांना ते पवित्र करीत होते. ऋषिमुनींच्या आश्रमात जाऊन सर्वाच्यादक्षेमकल्याणाची विचारपूस करावी, कोठे स्नानसंध्यादी अनुष्ठान करुन क्षणभर विश्रांती घ्यावी तर कोठे भोजन करुनही भक्तजनांच्या मनाला संतोषीत करावे. अशा थाटात दत्तात्रेयमुनींची स्वारी तो सर्व रम्य प्रदेश अवलोकन करीत करीत सहयाचलाच्या रम्य परिसरात येऊन पोहोचली. सहय पर्वताचा तो परिसर त्यांना फारच रम्य वाटला. या भागातील पर्वतश्रेणीला काही ठिकाणी सिंहाद्री असेहि नाव दिलेले आढळते. दत्तात्रेयप्रभूंची ही तर जन्मभूमीच असल्यामुळे या परिसरात त्यांचे मन रमणे हे स्वाभाविकच आहे. तशी तर संपूर्ण सहयाद्रीची सर्व शिखरे त्यांना प्रिय वाटत होती पण त्यातल्या त्यात माहूरगडाच्या परिसरातील अनसूयेच्या शिखराजवळ असलेले एक शिखर दत्तात्रेयांना फारच आवडले. तेथेच ते बराच काळ आश्रम करुन राहिले. हे सर्व शिखर आज दत्तपादुकाशिखर अथवा दत्तशिखर या नावाने ओळखले जाते.
१५) दिगंबर
दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार 'दिगंबर' या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला.
जन्म:- आश्विन शुद्ध १५
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, सूर्योदयाच्या वेळेस हा अवतार झाला. श्रीप्रभूंनी या
अवतारात सोमवंशी राजा यदु आणि हिरण्यकश्यप आणि कयाधूचा पुत्र भक्त प्रल्हाद यांचे कल्याण केले.
कावेरी नदीच्या परिसरातील अरण्यात भटकत असताना यदु राजाला एक दिगंबर यती दिसला. त्याने या यतींना वाकून नमस्कार केला आणि विचारले की, "आपण तरूण आहात, तेजस्वी आहात, निरोगी सुद्धा दिसत आहात मग आपण अशा घनदाट अरण्यात का राहत आहात? आणि येथे असूनही आपण आनंदी आणि निश्चिंत आहात! हे कसे काय हे कृपा करून मला सांगा!"
दिगंबरयती म्हणाले, "उदात्त अशा या प्रकृतीपासून मी चोवीस गुरू केले आहेत आणि आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकलो आहे. त्याद्वारेच मला विवेक, वैराग्य, मनःशांती आणि समाधान प्राप्त झाले आहे." हे ऐकताच यदु राजा त्यांना शरण गेला. पुढे यदुराजाचे कल्याण झाले. त्याची वंशावळ वाढत गेली. श्रीविष्णूंचा पूर्णावतार - श्रीकृष्ण याच वंशात झाला. भक्त शिरोमणी प्रल्हादावरही श्रीगुरूंनी अशीच कृपा केली. हिरण्यकश्यपूच्या मृत्यूनंतर शुक्राचार्यांनी प्रल्हादाचा उपनयन विधी केला आणि त्याला राज्यकारभाराचे अधिकार मिळाले. एक आदर्श राजा म्हणून त्याने हजार वर्षांपर्यंत उत्तम प्रकारे राज्यकारभार पाहिला. परंतु ब्रम्हज्ञान झाले नसल्याने आत कुठेतरी प्रल्हाद अस्वस्थ होते. अखेरीस, ते कावेरी नदीच्या परिसरातील अरण्यात निघाले आणि तेथे त्यांना एक तेजस्वी दिगंबर यती जमिनीवर पहूडलेले दिसले. त्यांच्या सर्वांगाला धूळ लागली होती.
प्रल्हादांनी त्यांना प्रणाम केला आणि विचारले, "आपण इतक्या घनदाट अरण्यात येथे कसे काय? आणि तेही शांत आणि समाधानी? कृपया मलाही सांगावे" श्रीगुरूंनी पुन्हा त्यांनाही आपल्या चोवीस गुरूंबद्दल आणि त्यांपासून घेतलेल्या बोधाबद्दल माहिती दिली. हे ऐकताच प्रल्हादांच्या मनाचे समाधान झाले आणि गुरूबोधाने त्यांना ब्रम्हज्ञानही प्राप्त झाले.
वैराग्याज्ञानयुक्ताय | आत्मविवेकप्रदायका ||
दिगंबरावधूताय | दत्तात्रेयाय नमो नम:||
ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण असलेल्या, हे संपूर्ण जग परमात्म्याचाच अंश आहे असा आत्मविवेक प्रदान करणार्या, दिगंबरावधूत अवतार धारण करणाऱ्या ज्ञानमूर्ती श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
१६) कमललोचन श्रीकृष्णश्यामनयन
'कमललोचन' नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले.
जन्म:- कार्तिक शुद्ध १५
भगवान सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांचा सोळावा अवतार श्रीकृष्णश्यामनयन या नावाने ओळखला जातो. आदिगुरु श्रीदत्तात्रेय अवधूत यांनी योगिराज, अत्रिवरद इत्यादि अनेक अवतार घेवून या भूतलावर ज्ञान, भक्ती आणि वैराग्य त्याचप्रमाणे अष्टांगयोग या सर्व साधनांचा अधिकारपरत्वे भक्तजनांना उपदेश करुन कृतार्थ केले. त्याला उत्तम पदाला पोहचविले. आता भगवान श्रीदत्तात्रेय हे स्वत:ला कृतकृत्य समजून ज्ञानरुपी पर्यंकावर पहूडले आणि योगनिद्रेचा अवलंब करुन विश्रांती घेऊ लागले. इतक्यात अनेक भक्त व अनेक शिष्य दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊ जमले. ते सर्व आदिगुरु कृपेने कृतार्थच झालेले होते. त्या सर्वांनी गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. ते सर्वांगसुंदर असलेल्या दत्तप्रभूकडे पाहत आहोत तोच पाहता पाहता श्रीकृष्णश्यामकमललोचन या स्वरुपात त्यांना दत्तगुरुंचे दर्शन झाले. भगवान श्री दत्तात्रेयांचा हा अवतार कार्तिक शुध्द व्दादशीच्या दिवशी बुधवारी रेवती नक्षत्रावर भगवान सुर्यनारायण उदयाला येत असतानांच झाला. सर्व विश्वाचे अधिष्ठान असलेला तो परमात्मा अवधूत श्रीकृष्णश्यामकमललोचन या रुपाने प्रकट होताच सर्वांनी जयजयकार करुन पुष्पवृष्टि केली.
श्री दत्तात्रेयांनी योगीराज, अत्रिवरद इत्यादी अनेक अवतार धारण केले आणि ज्ञान, भक्ती, वैराग्य, अष्टांगयोग साधना इत्यादींनी आपल्या भक्तांना प्रबोधन केले. असेच एकदा भगवान श्री दत्तात्रेय ज्ञानशय्येवर स्थित होते (परात्परयोग्याची कुठलीही मुद्रा ही ज्ञानमयच असते) आणि योगनिद्रेत होते. त्यावेळी काही भाविक आणि शिष्य त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांना श्रीगुरू सच्चिदानंद स्वरूप दिसले. श्रीकृष्णासारखे ते रूप पाहून सर्व धन्य झाले. श्री
दत्तात्रेय त्यांना म्हणाले, "सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्याने जे सार म्हणून प्राप्त होते, ते मूळ तत्व मी तुम्हाला सांगतो ज्याचा अभ्यास केल्याने तुम्हाला लवकरच शाश्वत ज्ञानाची प्राप्ती होईल. वैदिक धर्म हा चिरंतन आहे. वेदच त्याचे मूळस्वरूप आहेत. म्हणूनच धर्म हा मुख्य आणि कायम आहे. मी केवळ अत्रीऋषींसाठीच 'दत्त' आहे असे नाही तर, ज्यांनी अनन्यभावाने माझे चिंतन केले त्यांना मी स्वत:ला दिले. (ते मत्स्वरूपच झाले) अशा भाविकांना मी सायुज्यता प्रदान केली आणि ते माझ्यातच विलीन झाले."
ज्ञानशय्यास्थिताभगवन् |
नित्यसायुज्यदायका ||
श्रीकृष्णश्यामकमलनयना |
दत्तात्रेयाय नमो नम:||
ज्ञानशय्येमध्ये स्थित असलेल्या (नित्य पराज्ञानस्वरूप असणाऱ्या), (सर्वसमर्पणभावाने
आपली भक्ती करणाऱ्यांना) नित्य सायुज्य प्रदान करणार्या, श्रीकृष्णश्यामकमलन अवतार धारण करणाऱ्या परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
श्रीगुरूंचे हे सोळावे अवतार!
No comments:
Post a Comment